बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४ रोजी शिवतीर्थ प्रांत कार्यालय या मार्गावर सायंकाळी ४ वाजता मानवाधिकार हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सनतकुमार दायमा, बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, बांगलादेशातील हिंदू समाज बांधवांवर अमानवीय अत्याचार होत आहेत, हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. त्याविरोधात जागृती करणे आणि समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.
भारतीय संविधानाने शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार दिला असून, नागरिक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे. ज्या नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांनी दंडावर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करावा. तसेच, शहरातील मंदिरांमध्येही महाआरती घेऊन बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी प्रार्थना करण्यात येईल. हिंदू न्याय यात्रा दरम्यान, प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल.
या माध्यमातून हिंदूवरील अत्याचारांची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी श्रीवास पंडित दास, पंढरीनाथ ठाणेकर, योगेश जेरे, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, विजय पाटील, सर्जेराव कुंभार, दत्ता पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.