सांगलीच्या राजकारणात कालचा दिवस खूप दुर्दैवी: पृथ्वीराज पाटील

सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने सन २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये. त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील. भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवलाय, हे समजण्यापलीकडे आहे अशी टीका काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज मांडली.

ते म्हणाले, राजकारण राजकारणाच्या जागी आणि सांगलीचा विकास त्याच्या जागी, ही भूमिका घेऊन आम्ही काम केले आहे. ज्या क्षणाला निकाल लागला, त्या क्षणाला सामान्य लोकांच्या हितासाठी मी लागलो आहे. विकासकामासाठी सत्ताधाऱ्यांना साथ देणे आणि जे चुकते, तेथे पाय रोवून विरोध करणे, हीच भूमिका काँग्रेसने सतत बजावली आहे.

भाजप, महायुतीचे नेतृत्व मात्र सांगलीच्या एकूण राजकारणाला दुय्यम लेखताना दिसत आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते दिवंगत पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांच्यासह जयंत पाटील, विश्वजित कदम, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक असे एकाहून एक मंत्री या जिल्ह्याने दिले. महायुतीला बहुधा त्या क्षमतेचे नेतृत्व सांगलीत दिसत नसावे. सन २०१४ ला युतीचे पाच आमदार असताना मंत्रिपदाचा दुष्काळ होता. तेच आता घडले आहे. उपऱ्या पालकमंत्र्यांवर कारभार होणार कसा? महायुतीला आम्ही सांगलीची फरफट करू देणार नाही.