सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात, पाच जानेवारीपर्यंत….

सोलापूरला पाणीपुरवठा करणार्‍या औज बंधार्‍यात दहा ते पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गुरुवारी उजनीतून भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून गुरुवारपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता 1600 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. दुपारी तीन वाजता तीन हजार क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडले जात होते. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करून ते सहा हजार क्युसेकने सोडण्यात येणार आहे.

भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधार्‍यात आल्यानंतर सोलापूरचा पाणीप्रश्न पुढील काही महिने मिटणार आहे. औज बंधार्‍यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने महापालिकेने उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे बैठक झाली. त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पहिलाच निर्णय सोलापूरला पाणी सोडण्याचा घेतला होता. त्यानुसार गुरुवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी पाच जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे औज बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. दरम्यान, पुढील महिन्यात सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. या काळात सोलापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. त्यातच समांतर जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

दहा दिवसांत सहा टीएमसी पाणी

उजीनतून गुरुवारी सहा हजार क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी पुढील दहा दिवस चालू राहणार आहे. या दहा दिवसांत उजनीतून सहा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे औज बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. त्याने सोलापूरला पाणीपुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.