सांगोलामार्गे जाणाऱ्या रत्नागिरी- सोलापूर एन. एच. ९६५ राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या टोल रोडची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी गतिरोधक जीर्ण झाले आहेत. विद्युत लाईट दिवे पूर्णपणे बंद झाले आहेत. महामार्गावर व बायपासवर केरकचरा पडला आहे. यामुळे टोल भरूनही वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, लाखो रुपयांची टोल वसुली केली जाते. मात्र देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासाबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला काही घेणे देणे राहिलेले नाही. यामुळे वाहनधारकांतून अनेक तक्रारी उपस्थित केल्या जात आहेत.
रत्नागिरी-सोलापूर या महामार्गाचे रुंदीकरण झाले. या महामार्गावर सांगोला शहरातील बायपास म्हणजेच पंढरपूर रोड, चिंचोली रोड, महूद रोड, एखतपूर रोड, जुना मिरज रोड या बायपास ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रुंदीकरणानंतर रस्ता मोठा झाला. वाहनांचा वेग वाढला. टोल वसुली जोमाने सुरू झाली. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. महामार्गाची दुरवस्था, विद्युत लाईट, स्वच्छता, अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची गांभीर्याने व तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही.
पोलिस पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशाही तक्रारी वाढत आहेत. यासह अनेक ठिकाणी महामार्गाचे शौचालयास कुलूप असल्याचे वाहनधारकांमधून तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र संबंधित टोल प्रशासन फक्त पैसे वसूल करण्याचे काम करीत आहे… याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर निर्बंध घालावेत, महामार्गाची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.