देशात नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गोड पदार्थ महागणार असल्याचं दिसतंय. कारण साखर महागणार असल्याची माहिती मिळतेय. अकरा रूपयांनी साखरेचे प्रतिकिलो भाव वाढू शकतात.शेतकरी आणि साखर संघटनांकडून साखरेची एमएसपी वाढवावी अशी मागणी गेली कित्येक दिवसांपासून केली जातेय. सरकारने एमएसपी वाढवल्यास किरकोळ बाजारातही साखरेचे दर नक्कीच वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे.
साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. सध्या साखरेचा एमएसपी 31 रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. हा दर फेब्रुवारी 2019 मध्ये सेट करण्यात आला होता. त्यानंतर साखरेच्या एमएसपीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, वाढता उत्पादन खर्च आणि साखर कारखानदारांसमोरील आर्थिक दबावामुळे उद्योग संघटना सातत्याने दर वाढवण्याची मागणी करत आहेत.