इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे रुपडे पालटत असून अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याच अनुषंगाने डायलेसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर इचलकरंजी ही कामगारांची नगरी आहे. याठिकाणी देशाच्या कानाकोपर्यातून रोजगार आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे वास्तव्यात आहेत. त्यांच्यातील कुपोषित बालक आणि माता यांच्यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात संगोपन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
हे केंद्र खालच्या मजल्यावर होते. ते आता पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले असून त्याचाही शुभारंभ माजी मंत्री आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या केंद्राद्वारे कुपोषित बालक आणि मातांना सकस आहार दिला जात असून त्याचाही अनेकांना लाभ होत आहे. पण त्यामध्ये इचलकरंजीतील एकही कुपोषित बालक नाही याचाही आनंद आहे.
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंगळवारपासून डायलेसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. डायलेसिस व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून सुविधा अभावी अन्यत्र जाण्याचा त्रास थांबला आहे. दरम्यान, लवकरच रुग्णालयात एमआरआय मशिनही उपलब्ध होणार असून नजीकच्या काळात नर्सिंग कॉलेजही सुरु करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक त्या भौतिक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आवश्यक तो स्टाफ उपलब्धतेसाठी पदनिर्मिर्ती करण्याची प्रक्रिया लवकरच होईल. एमआरआय मशिन रुग्णालयासाठी गरजेचे असल्याने ते तातडीने उपलब्ध होण्याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास 300 बेडची मंजूरी असल्याने याठिकाणी बीएसस्सी नर्सिंग कॉलेज सुरु करण्याची आपली मागणी आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव तयार करुन द्यावा, त्याला शासनाकडून मंजूरी आणू, असेही माजी मंत्री आवाडे यांनी सांगितले.