सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. पण हि पाणी टंचाई दूर करण्यासाठी रब्बी हंगामातील पिकासाठी ४ जानेवारीपासून उजनी धरणातून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन येत्या १० फेब्रुवारीला बंद केले जाणार आहे. त्याशिवाय सध्या बोगद्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.दरम्यान, सध्या धरणात ४३.५० टीएमसी इतके पाणी आहे. आगामी उन्हाळी हंगामाचा विचार करता ते पुरेसे आहे, त्यामुळे आणखी एखादे आवर्तन त्यातून मिळू शकते, असे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यापैकी दीड लाख हेक्टरवरील पिकांना उजनी धरणातून पाणी मिळते. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरल्याने पाण्याची फारशी चिंता नाही. तरीही गेल्या २० दिवसात धरणातून पावणेआठ तर मागील अडीच महिन्यात १५ टीएमसी पाणी कमी झाले आहे.
पण उन्हाळा जसजसा जवळ येतो, तशी पाण्याची गरज वाढते, असा अनुभव आहे. त्यामुळे सध्याच्या पाण्याच्या पहिल्या आवर्तनाने काहीसा दिलासा मिळत आहे. पण पुढे आणखी एक आवर्तन मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.त्यामुळे या दोन्हीचा मेळ घालून पाण्याचे नियोजन कऱण्यात येत आहे. सध्या कालव्यातून २५०० क्युसेक, बोगद्यातून ३०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेला १६० क्युसेक आणि दहिगाव उपसा योजनेला ८० क्युसेक इतके पाणी सुरु आहे. आधीच्या नियोजनानुसार आता धरणातून सोडण्यात आलेले पाणी १० फेब्रुवारीला बंद करण्यात येणार आहे.