देशाच्या इतिहासात शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून जितके काम केले, तितके कोणीही केले नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा शरद पवार यांच्यावर विश्वास असून, अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वारंवार पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करू नयेत, असा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना आ. पाटील यांनी हा सल्ला दिला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी शरद पवार यांचे काम समजून घेतले असते तर त्यांना प्रश्नच पडला नसता.
पवार यांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवले. पिकांना चांगला हमीभाव दिला, फळबागांना अनुदान दिले. त्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पिके घेत आहेत. त्यांनी कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केले. अमित शहा जर देशात फिरले, तर त्यांना तेथील शेतकरी सांगेल की, त्यांचा सात-बारा पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेज दिले. ‘एफआरपी’चे धोरण आणले आणि त्याची कडक अंमलबजावणी केली. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकेन, पण त्याला दिवस कमी पडेल.