Mahakumbh Stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना महत्त्वाच आवाहन…..

आज मौनी अमावस्या आणि शाही स्नानाचा दिवस. त्यासाठी उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली आहे. गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज आहे. आज पहाटे महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना स्नानासाठी संगम नोजवर जाऊ नका असं आवाहन केलं आहे.

त्याऐवजी गंगा किनारी असलेल्या अन्य घाटांवर शाही स्नान करण्याचं अपील केलं आहे. त्रिवेणी संगम येथे ही चेंगराचेंगरी झाली.एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकांना प्रशासनाच्या सूचनांच पालन करण्याच आवाहन केलं आहे. “कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका तसच सहकार्य करण्याच आवाहन केलय. अन्य घाटांवर अत्यंत शांततेत भाविकांच स्नान सुरु आहे” असं योगी म्हणाले. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासाभरात दोनवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली.

मोदी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून पूर्ण सहकार्याच आश्वासन दिलं.संगम नोज येथे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जखमींना मेला ग्राऊंड येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. “चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे साधू-ऋषींनी सध्यासाठी मौनी अमावस्येच अमृत स्नान रद्द केलय” अशी माहिती अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली.