Vitthal Rukmini : यांना मिळणार विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची नाही गरज, मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय

राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदंपत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती. मात्र हीच घोषणा आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुन्हा एकदा केली. विशेष म्हणजे केवळ नवदाम्पत्यच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. अनेक जण राज्यातील कोनाकोपर्‍यातून दर्शनासाठी येतात.

नवदाम्पत्याला दर्शनासाठी तासन तास लागतात. आता पंढरपूरात वेळ वाचणार असल्याने त्यांना इतर धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार आहे.या 8 फेब्रुवारी रोजी माघ यात्रा आहे. त्यासाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्रांप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे.

भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 या वेळात आता थेट दर्शन दिले जाणार आहे . यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी 6 ते 6:30 एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा. आज झालेल्या बैठकीत ही वेळ वाढविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनाही विठुरायाचे दर्शन सुलभ रीतीने होणार आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध, अपंग, दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअर ची व्यवस्था केली जाणार आहे. अंध , अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा आनंद घेता येणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.