इचलकरंजी शहरात पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. हा मुद्दा खूपच जगजाहीर आहे. भागातील नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गळतीमुळे देखील पाणीपुरवठा अपुरा होतो. इचलकरंजी शहराला कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला गळती तसेच पंचगंगा प्रदूषणामुळे पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होत नाही. त्यामुळे शहराला चार-पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. शहरवासियांना महानगरपालिकेच्या माध्यमातून मारलेल्या बोअरिंगचा आधार घ्यावा लागतो.
इचलकरंजी वासियांना पाण्याची समस्या कायमपणे पाचवीला पुजली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकेंद्रामध्ये गेल्या काही दिवसापासून शुध्द पाण्याच्या वितरण नलिकेला मोठी गळती लागली आहे. सदर गळती काढण्याचे काम हाती घेतल्यानंतर शहरातील काही भागातील पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. त्यामुळे गळती काढण्याचे काम हाती घेतले नसल्याचे समजते. परंतू दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. आज ना उद्या सदरची गळती काढावीच लागणार आहे. तेव्हा दररोज हजारो लिटर पाणी वाया जाण्याऐवजी सदरची गळती काढावी अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
शहरातील अनेक मुख्य रस्त्यासह लहान- मोठ्या गल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी खाजगी नळ कनेक्शनला तसेच सार्वजनिक वितरण नलिकेला गळती लागली आहे. सदरची गळती तातडीने काढत नसल्याने रस्त्याची मोठया प्रमाणात वाताहात होत आहे. तेव्हा लागलेली गळती तातडीने काढावीत अशी मागणी होत आहे.