आलमट्टीचा वाद पेटला? आक्रमक कृती समितीचा खासदार पाटलांना इशारा….

आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने घेतला आहे. या निर्णयाला कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच सरकारने विरोध केलेला नाही. धक्कादायक म्हणजे आलमट्टीमुळे पुराचा फटका कोल्हापूरसह सांगलीला बसत असल्याने धरणाची उंची वाढणार नाही, अशी कबूली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. पण आता खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत आलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने याला विरोधच केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे सांगली कृष्णा नदी महापूर कृती समितीने राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.

कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी, आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने घेतला. मात्र त्याला विरोध न करणे ही राज्य सरकारची भूमिका सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याला महापुरात बुडवणारी आहे. त्यामुळे आता राज्य शासनाचा निषेध करत आहोत. पण कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास धरणावर मोर्चा काढू असा इशारा कृष्णा नदी महापूर कृती समितीने दिला आहे.

खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत आलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ज्याला सात महिन्यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीच्या पत्राने उत्तर मिळाले. याच पत्रावरून विशाल पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली होती. तर या पत्रात, कर्नाटक सरकारने आलमट्टी उंची वाढवण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याला कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने विरोध केलेला नाही. यामुळे कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाची उंची वाढणार असल्याचे म्हटलं आहे.

तर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील अनेक तालुके महापुराच्या पाण्यात बुडणार आहेत. यामुळेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला असून वेळप्रसंगी आलमट्टी धरणावर मोर्चा काढून विरोध नोंदवला जाईल,’ असा इशारा समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

तसेच याबाबत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र विरोध असून तो केला जाईल, असे म्हटले होते. पण आता केंद्रीतील त्यांचेच मंत्री कोणत्याच राज्याने विरोध नसल्याचे सांगत असून हा प्रकार गंभीर आहे. असे झाल्यास तीनही जिल्ह्यांतील मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींना संघटना गप्प बसू देणार नाही. संघटना गप्प बसणार नाहीत, धरणावर थेट मोर्चा नेला जाईल, असेही संकेत दिले आहेत.

खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते असून ते विपक्ष म्हणून निवडूण आले आहेत. त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला आहे. तर सध्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच अन्य नेत्यांबरोबर खासदार पाटील यांचे संबंध चांगले असून त्यांनीच यात आता पुढाकार घ्यावा. त्यांनीच सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करावे. कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्र्यांना भेटून त्यांना येथील शेतकरी आणि नागरिकांचे म्हणणे सांगावे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध करावा, असे म्हटलं आहे.