आई वडील आपल्या जीवाचे रान करून मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. पण हेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काही कृतघ्न मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये धाडतात. तर काहीजण शेजारी, नातेवाईक, समाजाच्या दबावापोटी आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत. मात्र, त्यांचा घरी छळ केला जातो. अशावेळी वृद्ध आई-वडील मरणाच्या दिवसाची वाट पाहत राहतात. मात्र, राज्यातील एका ग्रामपंचायतीने वृद्ध आईवडिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या मुलांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापुरातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने एक ठराव पास केला आहे. या ठरावाचे संपूर्ण राज्यात कौतुक केले जात आहे. जी मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीच्या सुविधा दिल्या जाणार नाहीत, असा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या ठरावाचे ठरावाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे. अशा प्रकारचा ठराव करणारी तळे हिप्परगा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
आई वडील हे मुलांना मोठे करतात. मात्र, त्यांच्या म्हातारपणात त्यांना घराबाहेर काढल्यास त्यांना कोण सांभाळणार ? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही ग्रामपंचायतीने हा ठराव केलेला आहे आणि त्याचे लोकांनी स्वागत केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. त्याचबरोबर गावात डिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असल्याचा ठरावदेखील यावेळी करण्यात आला.