प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे धक्कातंत्र, दिग्गज नेत्यांऐवजी ‘या’ नावाला पसंती!

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची धुळदाण उडाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात काँग्रेसचा नवा कर्णधार कोण, याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. महाराष्ट्र सारख्या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा एकदा आपली पकड मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्षांची चर्चा सुरू झाली.

नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, विश्वजित कदम, सतेज पाटील, अमित देशमुख अशी नावे चर्चेत होती. यात सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, यातील काहींनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिला.

काँग्रेस हायकमांड धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड होण्याची शक्यता आहे. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात. हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मार्च 2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी बाकावरील 18 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यात सपकाळ यांचा समावेश होता. सपकाळ हे राज्यातला नावाजलेला चेहरा नसला तरी त्यांना पक्षातील संघटना बळकटीसाठी काम केले आहे. त्याशिवाय, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये त्यांनी काम देखील केले आहे. त्यामुळे संघटना बळकटीसाठी सपकाळ योग्य पर्याय ठरतील असे म्हटले जात आहे.