रुकडी ते हातकणंगले दरम्यान कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसला लाग! प्रवाशांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला….

अलीकडे आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. कधी उसाच्या शेतात तर कधी कारखान्याला तर कधी घराला आग लागत आहे यामध्ये खूपच नुकसान होतेच त्याचबरोबर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसला रुकडी ते हातकणंगले दरम्यान गाडीच्या वातानुकूलित एम – २ बोगीच्या चाकातील ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाडातील प्रचंड घर्षणामुळे आग लागल्याची घटना घडली. घटने दरम्यान प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत चेन ओढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर गाडीची मिरजेमध्ये तपासणी केल्यानंतर गाडीची सुरक्षितता पाहून पुन्हा मुंबईकडे रवाना केली.

दरम्यान गाडीला मिरज स्थानकामध्ये तब्बल एक तास उशीर झाला. प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी, मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (क्रमांक १७४१२) ला कोल्हापूर मिरज दरम्यान पंचगंगा नदीनजीक आग लागल्याची घटना घडली. धूर आणि वास येऊ लागल्याने प्रवाशांनी तत्काळ गाडीची साखळी ओढून थांबवली. यावेळी गाडीचे इंजन पंचगंगा पुलादरम्यान थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चालक आणि गार्डने पाहणी केली असता एम – २ या वातानुकूलित बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.

गाडीतील आग रोधक सिलिंडरने आग विझवून ती मिरजेकडे रवाना झाली. मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एक तासाने ती मुंबईकडे रवाना झाली. कोल्हापूर स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर वळिवडे स्थानकाच्या काही किलोमीटर ही घटना घडल्यावर प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली.

प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षितस्थळी थांबले. गाडी सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा प्रवास केला. दरम्यान या गाडीचे इंजन नदीशेजारी थांबल्यामुळे अनर्थ टळला. साखळी ओढल्यानंतर गाडी नदीवर थांबली असती तर प्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्या असत्या आणि मोठी दुर्घटना घडली असती.