सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. नागरिकांना यासाठी वणवण करावी लागते. रब्बी हंगामासाठी टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून येत्या आठवड्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असून बुद्धेहाळ तलावासह माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
आठवडाभरात टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बिहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. नदी, तलाव, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या प्रारंभाच्या उद्घाटनासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे चिकमहूद येथे आले होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्याशी संपर्क साधून टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ फेब्रुवारीपासून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.