इचलकरंजीत १६ केंद्रावर दहावी परीक्षेची बैठक व्यवस्था!९ हजार ६१७ विद्यार्थी देणार परीक्षा

आजपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ ते १७ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक + परिक्षेसाठी बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे.

इचलकरंजी व परिसरात एकूण १६ केंद्र असून त्यामध्ये ९ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या सर्व केंद्रांवर गोविंदराव हायस्कूल आणि डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल या दोन कस्टडीतून संपूर्ण नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती कस्टडी प्रमुख एन. जे. पाटील व अजय बिरणगे यांनी दिली.

इचलकरंजी केंद्र अंतर्गत गोविंदराव हायस्कुल, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कुल, व्यंकटराव हायस्कुल, आंतरभारती विद्यालय, छत्रपती राजर्षि शाहू हायस्कुल, शहापूर हायस्कुल, कबनूर हायस्कुल, व्यंकटेश्वरा इंग्लिश हायस्कुल, हुपरी इंग्लिश स्कुल, न्यु इंग्लिश स्कुल लाट, न्यू इंग्लिश स्कुल रेंदाळ, एम. जी. शहा विद्यालय बाहुबली, श्री रामराव इंगवले हायस्कुल हातकणंगले, दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कुल पट्टणकोडोली, सन्मती विद्यालय तारदाळ, महात्मा गांधी विद्यालय रुकडी अशी १६ केंद्र आहेत.

 कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महसूल, पोलिस, शिक्षणाधिकारी, यांचीही विशेष पथके असणार आहेत. परीक्षा तणाव आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रांवर योग्य ते नियोजन केले आहे.