लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र पहायला मिळाले. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर अनेक चर्चाना उधाण देखील आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या भेटीनंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर धरला असतानाच, मंत्री बावनकुळे यांच्याकडून या भेटीवर खुलासा झालेला असतानाच, आता जयंत पाटील यांनी देखील या भेटीवर त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.जयंत पाटील यांनी या भेटीवर मध्यरात्रीचे खंडण करताना, अशा अर्धवट बातम्या देणे खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, या अर्धवट बातम्या आहेत, असे सांगून भेटी मागचे कारण देखील सांगितले आहे.सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांबद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील 4,6,9 जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेऱ्यांचे प्रश्नांचा समावेश होता. तसेच सांगल जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्वांवर त्यांची भेट घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्या भेटीच्या वेळीवर देखील खुलासा केला. मंत्री बावनकुळे यांनी सायंकाळी सहा वाजताची वेळ दिली होती. मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले होते. या भेटीत काय चर्चा झाली, यावर देखील जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे