सांगली जिल्ह्याला नवीन बसेस देणार; परिवहनमंत्री सरनाईक यांची ग्वाही

कालबाह्य झालेल्या बसेस भंगारात घालून जिल्ह्याला नवीन बसेस द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. याबाबत शिंदे यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांना मुंबईत मंत्रालयात भेटून निवेदन दिले. यावेळी सरनाईक यांनी सांगली विभागाला नवीन बसेस देण्याची ग्वाही दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाला १५० बसेस मिळण्याबाबतचे निवेदन परिवहनमंत्री सरनाईक यांना एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली विभागाकडे असलेल्या वाहनांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने सद्यस्थितीला १४० ते १५० नवीन बसेस देण्यात याव्यात.

राज्य सरकारने देऊ केलेल्या प्रवासांच्या सवलतीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांना सेवा पुरविण्याकरिता नवीन बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. महामंडळात यापूर्वी दर चार वर्षांनी नवीन बसेसची बांधणी करून पुरवठा व्हायचा. त्याचे किलोमीटर दहा लाख व्हायचे. दहा लाख किलोमीटर पूर्ण झालेल्या बसेस भंगारमध्ये काढून त्यांचा लिलाव केला जातो. गेल्या दहा ते पंधरा वर्षात कोणतीही नवीन चेसिस किंवा बसबांधणी झालेली नाही. ज्या बसेस आहेत त्या भंगारात काढण्याची गरज आहे. अशा बसेसमुळे चालक, वाहक व प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.

भंगार बसेस तसेच बसेसची कमी संख्या यामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. म्हणून सांगली विभागाला नवीन १४० ते १५० बसेस द्याव्यात. यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगली विभागाला नवीन बसेस टप्प्या- टप्प्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.