उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांचे दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी विचारात घेऊन सुयोग्य नियोजन करणे आवश्यक असते. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळून चांगला बाजारभाव मिळेल. उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, घोसाळी, भेंडी, गवार, मिरची आणि टोमॅटो इत्यादी भाजीपाला पिकांचा समावेश असतो.
उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी अधिक प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. पाण्याची कमतरतेमुळे उत्पादन कमी मिळते, परंतु बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे विशेष कल असतो.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक असतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापण करणे अत्यंत आवश्यक आहे.
उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी :
- लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड
- कीड-रोग प्रतिकारक तसेच दर्जेदार उत्पादन आणि अधिक तापमानास सहनशील वाणांची निवड
- बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया
- दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर
- आच्छादनाचा वापर
- ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब
- शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर
- वाढीच्या अवस्थेनुसार योग्य संजीवकांचा वापर
- योग्यवेळी आंतरमशागतीची कामे
- टोमॅटो व वेलवर्गीय भाज्यांसाठी आधार देणे
- रोपवाटिका ते फळधारणा अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब
- उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेडनेट) वापर
वेलवर्गीय पिकांसाठी आधार व्यवस्थापन :
- वेलवर्गीय भाज्या उदा. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांचा वाढ चांगल्याप्रकारे होते. त्यासाठी मंडप किंवा ताटी पद्धती वापरून वेलींना आधार दिला जातो.
- दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्याकरिता वेलींना मंडप किंवा तारेच्या साह्याने वाढविणे गरजेचे असते. आधार दिल्यामुळे नवीन येणाऱ्या फुटींना वाढीसाठी सतत चांगला वाव मिळत राहतो. त्यामुळे फळधारणा चांगली होते. याउलट जमिनीवर पहिले काही फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात.
- मंडपावर चढविलेल्या वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिनेच चांगले राहतात.
- मंडपावर किंवा ताटीवर फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश एकसारखा मिळत असल्यामुळे फळांचा रंग एकसारखा आणि चांगला राहतो. फळांचा जमिनीसोबत संपर्क होत नाही. त्यामुळे ओलावा लागून फळ सडण्याचा धोका टाळला जातो. शिवाय कीड व रोगांचे प्रमाणही कमी राहते.
- फळांची तोडणी, रासायनिक फवारणी ही कामे करणे सुलभ होते. आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो.
- वेल मंडपावर पोहोचेपर्यंत दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. या काळात या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
पाणी व्यवस्थापन :
- उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते.
- सिंचन व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर, पिकाची वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात.
- उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पाण्याची बचत करणे शक्य होते.
- विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
- शक्यतो सकाळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी सिंचन करावे. भर उन्हात दुपारी सिंचन करणे टाळावे.
खत व्यवस्थापन :
- भाजीपाला पिकांसाठी रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे योग्य ठरते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखताचा किंवा गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करणे जमिनीच्या दृष्टीने हिताचे असते.
- भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार पीकनिहाय रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
- सर्व भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार नत्र, स्फुरद, पालाश व चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेली नत्राची मात्रा लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
खत व्यवस्थापन :
- भाजीपाला पिकांसाठी रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे योग्य ठरते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखताचा किंवा गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करणे जमिनीच्या दृष्टीने हिताचे असते.
- भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार पीकनिहाय रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
- सर्व भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार नत्र, स्फुरद, पालाश व चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेली नत्राची मात्रा लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
कीड-रोग व्यवस्थापन :
- भाजीपाला पिकांमध्ये सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे तसेच कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- रोपांपासून पुनर्लागवड करावयाची असलेल्या भाजीपाला पिकांची उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर
- इत्यादींची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या पिकांमध्ये सुरुवातीच्या काळात रस शोषणाऱ्या किडींचे योग्यप्रकारे नियंत्रण न झाल्यास पुढे विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपे असल्यापासून रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- भाजीपाला पिकांमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), शेंडा व फळ पोखरणारी अळी, मेलान वर्म, रोपे, देठ कुरतडणारी अळी, फळमाशी इत्यादी किडींचा देखील प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच करपा, भुरी, मर रोग, पर्णगुच्छ किंवा बोकड्या, पाने, फांद्यावर, फळांवर रोगामुळे पडणारे ठिपके, फळसड, केवडा, डिंक्या इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो. या कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
- कीड-रोग नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशके किंवा बुरशीनाशकांची फवारणी करावी. तसेच बुरशीनाशकांसोबत कीटकनाशकांची सुसंगतता जाणून घेणे आवश्यक आहे. भाजीपाला पिके फुलोरा अवस्थेत असताना त्यांचा समंजसपणे वापर करावा.