सातत्याने मागणी करुनही नळाला पाणी येत नसल्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ महालक्ष्मीनगर येथील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. शहापूर रोडवरील कृष्णानगर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे दुसऱ्या गल्लीत जवळपास २५ घरातील नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे या नागरिकांना पाण्यासाठी सातत्याने वणवण करावी लागत आहे. त्यातच चार- पाच दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने महिला वर्गाला नाहक त्रास सोसावा लागत आहे.
या संदर्भात संबंधित मिळकतधारकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने वारंवार लेखी व तोंडी स्वरुपात तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे भागातील संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. महिलांनी पाणी पुरवठा अभियंता अभय शिरोलीकर यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. यावेळी प्रशासनाकडून ड्रेनेज लाईनचे काम सुरु असल्याने या भागात पाणी येत नाही. ड्रेनेजचे काम पूर्ण होताच लाईन लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी देण्यात येईल, अशी ग्वाही शिरोलीकर यांनी दिली. त्यानंतर नागरिक शांत झाले. परंतु पंधरा दिवसात हे काम न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.