माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा…अमिताभ यांचे प्रॉपर्टीविषयी वक्तव्य; कोट्यवधींची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार?

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते नेहमी आपल्या मनातील विचार असतील किंवा त्यांच्या चित्रपटांबद्दलची माहिती असेल किंवा त्याच्या काही वैयक्तिक बाबी असतील त्याबद्दल नेहमीच चाहत्यांपर्यंत अपडेट देत असतात. त्यातील एक नाव म्हणजे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन. अमिताभ यांना त्यांच्या सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधायला प्रचंड आवडतं. ते नेहमी ट्वीटरद्वारे किंवा इस्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात. आणि चाहतेही त्यांच्या प्रत्येक ट्वीटला किंवा पोस्टवर प्रतिक्रिया देत असतात.

बच्चन कुटुंबाच्या अनेक जुन्या मुलाखती आणि क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल

अमिताभ बच्चन अलिकडेच एक ट्वीट व्हायरल झाले होते. काहीच दिवसांपूर्वी अमिताभ यांनी ‘आता जाण्याची वेळ आलीये…’ असं ट्वीट करुन सर्वांना काळजीत टाकलं होतं. तसेच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांमुळेही बच्चन कुटुंब चर्चेत राहिलं होतं. या चर्चांदरम्यान बच्चन कुटुंबाच्या अनेक जुन्या मुलाखती आणि क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल झाल्या होत्या. अशाच एका क्लिपमध्ये 2011 सालच्या एका मुलाखतीत बिग बींनी दिलेली एक मुलाखतही अशीच व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीविषयी भाष्य केलं होतं.

बिग बी त्यांच्या प्रॉपर्टी वाटपासंबंधीत काय बोलले?

बिग बी मुलाखतीत त्यांच्या प्रॉपर्टी वाटपासंबंधीत बोलले होते. त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये म्हणजेच अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्यात समान वाटण्याबद्दल भाष्य केलं होतं. 2011 मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमिताभ यांनी म्हटलं होतं की, ‘माझा जेव्हा मृत्यू होईल, तेव्हा माझ्याकडे जे काही आहे ते माझी मुलगी आणि मुलामध्ये समान वाटले जाईल, यात कोणताही भेदभाव राहणार नाही. जया आणि मी हे खूप पूर्वीच ठरवलं होतं.

मुलगी अन् अभिषेकबद्दल काय म्हणाले अमिताभ

प्रत्येकजण म्हणतो की मुलगी परकी असते, ती तिच्या पतीच्या घरी जाते,तेच तिचं घर असतं. पण माझ्या दृष्टीने ती आमची मुलगी आहे आणि तिलाही अभिषेकसारखेच अधिकार आहेत’ असं म्हणत त्यांची जेवढीही प्रॉपर्टी असले ती दोन्ही मुलांमध्ये समान वाटणार असल्याचं अमिताभ यांनी म्हटलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांची 2024 मध्ये एकूण संपत्ती 1,600 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

एका रिपोर्टनुसार अमिताभ यांनी त्यांच्या कुटुंबाचा प्रसिद्ध बंगला ‘जलसा’, त्यांची मुलगी श्वेता हिला भेट म्हणून दिला आहे. त्यावेळी, या मालमत्तेची किंमत तब्बल 50 कोटी होती. त्यावरूनही बच्चन कुटुंबात वाद झाल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र त्या बातम्यांवर बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने भाष्य केलं नव्हतं.