टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी तातडीने सोडावे; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील तसेच पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्या बैठकीत टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकन्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली. 

उन्ह खूप वाढू लागल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो त्यामुळे सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन एप्रिल महिन्यात सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्यावर जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दि. १० एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू करण्याचे बैठकीत आदेश दिले. सदरच्या बैठकीसाठी आ. रोहित पाटील, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुरेश बाबर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.