पंढरपूरच्या बसस्थानक हे राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून ओळखले जाते. येथे रोज हजारो प्रवासी भाविक ये-जा करत असतात. या प्रवाशांना बसस्थानकात अस्वच्छता, असुरक्षितता, पिण्याच्या पाण्याच्या पाण्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूर येथील नवीन बसस्थानकातून पंढरपूर ग्रामीण व राज्यभरात लांब पल्ल्याच्या बसेस धावतात. यामुळे येथे नेहमी प्रवाशांची गर्दी असते.
प्रवाशांची गरज लक्षात घेवून आगार प्रमुखांनी पिण्याच्या पाण्याची सोय उत्तमप्रकारे करणे गरजेचे आहे. उलट बसस्थानकात चार ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी प्रत्येकी चार चार चाव्या सुरु करण्याची व्यवस्था आहे. परंतु, तेथे दोन, एक चावी आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आणि पाण्याच्या तोट्यांची संख्या कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खावून पिचकाऱ्या मारण्यात आलेल्या असतात. त्यामुळे इच्छा असूनही प्रवाशांना पाणी प्यावेसे वाटत नाही. त्यामुळे बहुतांश प्रवाशी हे विकतचे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत.
मात्र, आगार प्रशासन याची दखल घेत नसल्याचे प्रवाशी वर्गाकडून सांगण्यात येते. बसस्थानकात सुलभ शोचालय उभारण्यात आलेले आहे. येथे लघुशंका करण्यासाठी मोफत सेवा आहे. परंतू, आगार व्यवस्थापनाच्या दुर्लक्षितपणामुळे बसस्थानकासमोरच दिवसरात्री प्रवाशी लघुशंका करत आहेत. यामुळे बसस्थानकातील बाकड्यांवर बसची प्रतीक्षा करत बसलेल्या प्रवाशांचा घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महिला आघाडीच्यावतीने बसस्थानकासमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवून प्रवाशांना सुरक्षितता पुरवणे, पिण्याचे पाणी, स्वच्छता राखणे, चोऱ्या रोखण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.