वक्फ बोर्ड बिल : हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना अजितदादांचे एका वाक्यात उत्तर म्हणाले की…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. चुकीची घटना घडली आहे, निश्चितपणे काहींच्या चुका झाल्या आहेत. मी आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांची चौकशी समिती नेमली आहे. याचा अहवाल मागितला गेला आहे. पैसे मागितले की किंवा काय नेमकी वस्तूस्थिती पाहून अहवाल आल्यानंतरच राज्य सरकार याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री ही आज पुण्यात होते. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत. आज महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक घेतली त्याचे अनेक प्रश्न होते. केंद्र सरकारने यात लक्ष घातले तर लवकर कामे होतील असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे

कोकाटे नेमके काय बोलले ते मला माहिती नाहीए…शेतकऱ्यांच्या बाबत असं जर काही बोलले असतील तर त्यांच्याकडून माहिती घेऊन मी बोलेल.आम्ही काम करत असताना आपली वक्तव्यं फार विचारपूर्वक केले पाहीजे,असं लाईटली बोलून कोणाला दुखावण्याचे कारण नाही, शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे. आज सगळ्यांना आपल्याला तो जगवतो, शेतकऱ्यांबाबत आम्हाला आत्मीयता आहे, तुमचं कर्तव्य आहे त्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, त्यांना बाजारपेठ कशी मिळेल, एकंदरीत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अशी चांगली राहील यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्न करीत असते असेही अजित पवार यांनी म्हणाले.

विमानतळ झाले पाहिजे, पण कुणावर अत्याचार होणार नाही

विमानतळ शेतकऱ्यांचे नुकसान होऊन करावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही. समृद्धी महामार्ग असेल इतर महामार्ग असतील आपल्याला जमिनी घ्यावी लागेल. त्या परिसरामध्ये त्यांनी त्या पैशाने अधिकची जमीन घ्यावी. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड मधून शहराच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात नागरिकरण झालेली लोकसंख्या पाहाता. आता विमानतळाची गरज आहे, जागा ठरलेल्या आहेत. थोडा पुढे गेलो तर बारामतीत जाते. परत अजून बारामती गेल्यामुळे टीका होते. आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल तर 24 तास चालू असावा लागतो. शेतकऱ्यांना नाराज करणे, त्यांना त्रास देण्याची भावना अजिबात नाही. ही चर्चा गेली पंधरा वर्षे चाललेली आहे. पुढच्या काही वर्षांची लोकसंख्या पाहता विमानतळ झाले पाहिजे. पण तिथे कुणावर आणि अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

वक्फ दुरुस्ती कायदा

राज्यसभेत प्रफुल भाई यांनी भूमिका मांडली आहे. लोकसभेत एकच माणूस आहे का ? काहीजण म्हणतात वक्फ बिल अन्यायकारक आहे. काहीजण म्हणतात की याच्यामुळे वक्फ बोर्डाच्या जेवढ्या जमिनी आहेत, तेवढा मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्यातून काही गोष्टीची सुधारणा व्हायला पाहिजे. दोन्ही बाजू ऐकायला मिळत आहेत. आम्ही पण पक्षांतर्गत काही चर्चा करणार आहोत. विरोधक वेगवेगळी टीका करीत आहेत. विरोधक दोन्ही बाजूने यामध्ये बोलत आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले.

सपकाळ यांना अध्यक्ष केल्यापासून किती चैतन्य निर्माण झालंय !

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्फ बिलावरुन राष्ट्रवादीवर टीका केली आहे. वक्फ बिल दुरुस्तीला पाठींबा देऊन अजित पवार यांनी मुस्लीमांचा विश्वासघात केला असे सपकाळ म्हणाले होते. त्याबद्दल विचारले असता अजितदादा संतापले आणि म्हणाले की कोण म्हणतो आम्ही मुस्लिम समाजाला त्रास दिला आहे ? असं कोणीतरी एक व्यक्ती बोलते. ती कधी लोकांच्या मधून निवडून येते का? एकदाच काय निवडून आलेली. त्यांना काय उत्तर देणार. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यास मी काही बांधील नाही. त्यामुळे बाकीच्यांनी फुकटचे सल्ले देऊ नये. सपकाळ यांना अध्यक्ष केल्यापासून काँग्रेसमध्ये किती चैतन्य निर्माण झालं आहे हे तुम्ही पाहात आहात अशा शब्दात अजितदादांनी सपकाळ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.