खानापूर – आटपाडीमध्ये भाजप, शिंदे गटातच जुंपली! निवडणुक ठरणार लक्षवेधी

लोकसभा निवडणुकीचे रणांगण अद्याप सुरू झालेले नसताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू असून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षामध्येच आमदारकीसाठी आतापासूनच इशारे-प्रतिइशारे देत विद्यमान आमदार अनिल बाबर यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आता यापुढे या मतदार संघाचा आमदार आटपाडी तालुक्याचा असेल ,असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिला आहे. यामुळे लोकसभेपाठोपाठ होणार्‍या विधानसभा निवडणुकीवेळी खानापूर-आटपाडीची निवडणुक लक्षवेधी तर ठरणार आहेच, पण याचबरोबर महायुतीतील अंतर्गत कलहाचा नमुना ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात शिवसेनेत बंडाळी होउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडून आपला गटच खरी शिवसेना म्हणून भाजपला साथ देत राज्यात सत्तांतर घडवून आणले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरत, गोहत्तीला जात असताना त्यांना सर्वात अगोदर साथ देणार्‍यामध्ये खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर होते.

राज्यात मंत्रीमंडळात आमदार बाबर यांना प्राधान्याने संधी मिळेल असे वाटत असतानाच मंत्रीमंडळ विस्तारही रखडला आहे. यामुळे सत्तेत सहभागी असूनही काही सदस्यांमध्ये अद्याप अस्वस्थता कायम आहे.

अपात्रतेबाबतचा निर्णय सभापती काय घेतात यावर मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजकीय अस्वस्थता कायम राहिली आहे. यामुळे आमदार बाबर जेष्ठ सदस्य असूनही त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या सहकार्‍यासह सत्तेत सहभाग घेतला असल्याने शिवसेनेतील सदस्याबाबत भाजपलाही फारसे औत्सुक्य आता उरलेले नाही.

मुंबईच्या राजकीय पटलावर आमदार बाबर यांचे महत्व कमी झाले की काय अशी स्थिती असताना मतदार संघातील स्थानिक भाजप नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार बाबर यांचे यशवंत कारखान्यावरून वाद तर आहेच, पण आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही कोणत्याही स्थितीत आमदार बाबर यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही अशी वक्तव्ये केली आहेत. तर विटा शहरात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही आमदारकीसाठी तयारी सुरू केली आहे.

टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे श्रेय केवळ आमदार बाबर यांचे नसून यामध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही योगदान असल्याचे सांगत आनंदोत्सव साजरा केला. बदलत्या राजकीय हवेचा परिणाम म्हणून त्यांनी आमदार जयंत पाटील यांची साथ सोडून अजितदादा गटात सहभागी होत या गटाचे जिल्हाध्यक्ष पदही पटकावले आहे. यामुळे महायुतीतच विधानसभेसाठी साठमारी होण्याची चिन्हे दिसत आहेत.