राज्यात कमाल तापमानाचा पारा पुढील काही दिवस आणखी वाढणार असल्याचं IMD ने सांगितलं असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेचे अलर्ट देण्यात आले आहेत. राज्यात प्रचंड उष्मा वाढलाय. विदर्भ वगळता आता संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढलाय.
उष्णतेचा चटका बसत असून कमाल तापमानाचा (Temperatures) पाराही वाढत जातोय.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी बहुतांश ठिकाणी तापमान (Temperatures) 40 अंशांच्या पुढे राहिले. अकोल्यात आज 44.5 अंश सेल्सियस तर वाशिम 42.4 अंश, यवतमाळ 42.9, अमरावती 42.8, नागपूर 42.3 अंश सेल्सियसवर आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहेत.
पुण्यात आज 40.8 अंश सेल्सियस तर सोलापूर 41.5 अंशांवर आहे. मराठवाड्यात परभणीत सलग चौथ्या दिवशी तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदवले गेले. कोकणासह मुंबई, उपनगर, ठाणे, पालघरमध्ये उष्ण व दमट हवामान आहे. आज विदर्भातील अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिवमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे. येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहणार असून विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.