आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी (Alok Joshi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राने या बोर्डाची पुनर्रचना केली. हे बोर्ड पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबींवर सल्ला देईल. आलोक जोशी यांच्याव्यतिरिक्त संरक्षण प्रमुख अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारत सरकारचे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह, वित्त मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आहेत.

आलोक जोशी (Alok Joshi) मूळचे लखनऊचे आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पदवी प्राप्त केली. राज्यशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. 1976 मध्ये हरियाणा कॅडरधून ते आयपीएस झाले. आपल्या कार्यकाळात त्यांना अनेक प्रमोशन्स मिळाले आणि वरच्या पदावर पोहोचले. 2005 मध्ये नेपाळ आणि पाकिस्तानमधील महत्त्वाच्या कारवायांसह गुप्तचर विभागाचे संयुक्त संचालक बनले

केंद्राने 2010 मध्ये रॉचे विशेष सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. 30 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी सचिव (निवृत्त) म्हणून पदभार स्वीकारला. 2012 मध्ये संजीव त्रिपाठी यांच्या जागी रॉचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईसाठी सर्वाधिकार दिले आहेत. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईसाठी फ्री हँड दिल्याचं वृत्त वृत्तसंस्थांनी दिलं आहे. पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, दहशतवादाला जोरदार प्रहार करण्याचा राष्ट्रीय संकल्प असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर देण्याची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचं पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसह ही बैठक झाली.