ईशान्य भारतात पर्ज्यन्य ; अरुणाचल ९ , तर आसाममध्ये ५ जणांचा मृत्यू , भुसखलनाचीही आपत्ती

ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे नऊ जणांचा जणांचा, तर आसाममध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे गेलेल्या बळींची संख्या ३० झाली आहे.

अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा भागात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने शुक्रवारी दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याचे पूर्व कामेंग पोलिस अधीक्षक कामदान सिकोम यांनी सांगितले. यात बळी गेलेले सर्व जण हे बाना येथील किटचांग जिल्ह्यातील रहिवासी होते, असेही ते म्हणाले.

या ठिकाणी बचावकार्य लगेच सुरू करण्यात आले. परंतु, मुसळधार पाऊस, सातत्याने होणारे भूस्खलन आणि रात्रभर अतिशय कमी असणारी दृश्यमानता यामुळे त्यात सतत व्यत्यय येत होता. अशा अडथळ्यांमध्येही पोलिस आणि बचाव पथकांकडून सातत्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसात आसाममधील कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली. एएसडीएमएने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पुरामुळे आसाममधील कामरूप, कामरूप (मेट्रो) आणि काचर हे तीन जिल्ह्यांतील सुमारे १० हजार १५० लोक बाधित झाले आहेत. गुवाहाटी शहरातही भूस्खलनाच्या तीन घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील रस्त्यांवर पाणी साचून राहू शकते. वाहतूक संथगतीने होऊ शकते. यामुळे दुर्घटनाच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.