भांडणात मध्यस्थी करताच जावयाला संपवलं

यवतमाळ शहर एकाच दिवशी घडलेल्या घटनांनी संपूर्ण शहर हादरले आहे. कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालत त्यांचा निर्घृण हत्या (killed) केलीय. तर दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करत जावयाची हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांसह हत्येचे सत्र सुरुच असून मागील चार महिन्यात खुनाच्या तब्बल 15 घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस खातं नक्की करतंय काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.

कौटूबिंक वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करुन त्याच्या निर्घुण हत्या (killed) केलीय. शहरातील बालाजी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली असून प्रमोद पंढरीनाथ पेंदोर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कविश्वर पंढरी पेंदोर असे लहान भावाचे नाव आहे. पिंपळगाव परिसरातील बालाजी मंगल कार्यालयाजवळ मृतक प्रमोद हा उभा होता. यावेळी त्याचा लहान भाऊ कवीश्वर तेथे आला. तसेच दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. त्यांनतर काही क्षणातच कवीश्वरने लोखंडी रॉडने प्रमोदच्या डोक्यावर आठ ते दहा प्रहार केले. यात प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून या प्रकरणी आता पोलीस नक्की काय कारवाई करतात याकडे नागरिकाचे लक्ष आहे.

दुसऱ्या घटनेत भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयाची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. या घटनेने यवतमाळ हादरले आहे. शेरूचा 19 वर्षांपूर्वी राधिकाशी प्रेमविवाह झाला होता. राधिकाची मावशी कविता आणि तिचा मुलगा नितीन यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्यावेळी वाद वाढू लागल्याने मध्यस्थी करण्यासाठी शेरू गेला असता, “तु मध्ये का आलास?” असे म्हणत नितीन व इतरांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे शेरूचा मृत्यू झाला. याप्रकरणी राधिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.