मुंबई लोकल म्हणजे प्रवाशांची लाइफलाइन आहे. लोकल एक दिवस जरी रखडली तर अर्धी मुंबई ठप्प होऊ शकतो. चाकरमान्यांचा आठवड्याच्या पहिल्याचदिवशी लोकल सेवा कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळं नागरिकांटा प्रवास खोळंबू शकतो व त्यांना प्रवासात अडथळ निर्माण होऊ शकतो. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमनने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळं मूक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. रिक्त पदांमुळं मोटरमनांनी जादा काम करावे लागते. त्यामुळं सतत आजारी पडणे व मानसिक स्वास्थ यावर त्याचा परिणाम होताना दिसत असल्याचं मोटरमनचं म्हणणं आहे.
दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित असून 4 मेपासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही जादा काम न करण्याचा निर्णय समस्त मोटरमनने घेतला आहे. त्यामुळं सोमवारी लोकल सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट लोकल फेऱ्यांवर होणार आहे. सध्या मध्य रेल्वेवर दररोज हजार लोकल धावतात. मात्र या लोकलसेवा चालवण्यासाठी मध्य रेल्वेकडे (trains) पुरेसे मोटरमन नाहीत त्यामुळं मोटरमन यांना जादा काम करुन फेऱ्या चालवाव्या लागतात. मोटरमन कॅबमध्ये कॅमेरे बसवून, प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करणाऱ्या मोटरमनवर संशय व्यक्त केला जात आहे, असे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने व्यक्त केले.त्यामुळे रविवारपासून जादा काम न करण्याचा निर्णय मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.
रविवारी लोकलची गर्दी कमी असते त्यामुळं मोटरमनच्या आंदोलनांचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र सोमवारी लोकलला चाकरमान्यांची गर्दी असते त्यामुळं लोकलसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकल विलंबाने धावल्या किंवा रद्द झाला तर त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि प्रवाशांना फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, यामुळं अर्थी मुंबई ठप्प होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.