6 संघ प्लेऑफच्या रेसमध्ये, मुंबई इंडियन्सला किती संधी ?

भारत – पाक तणावामुळे स्थगित झालेली आयपीएल 2025 शनिवार 17 मे पासून पुन्हा सुरु झालीये. आयपीएलमधील 58 वा सामना आरसीबी विरुद्ध केकेआर यान्चायत खेळवला जाणार होता, मात्र शनिवारी चिन्नस्वामी स्टेडियमवर पडलेल्या पावसामुळे सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक पॉईंट देण्यात आले. यामुळे कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून आता उर्वरित प्लेऑफचं समीकरण बदललं आहे.

चेन्नई सुपरकिंग्स, सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट राइडर्स, राजस्थान रॉयल्स हे 4 संघ आयपीएल 2025 मधील प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. तर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जाएंट्स, पंजाब किंग्स हे संघ अजूनही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या शर्यतीत आहे. तेव्हा या ६ संघाचं प्लेऑफचं समीकरण कास आहे याविषयी जाणून घेऊयात.

आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट आणि 17 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स, चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. तर सहाव्या स्थानावर लखनऊ सुपर जाएंट्स आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असून संघाने 12 सामन्यांत 8 विजयांसह 17 पॉईंट्स मिळवले आहेत, परंतु आरसीबी संघाला अद्याप प्लेऑफचे तिकीट मिळालेलं नाही. त्यांना पुढील सामने हे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचे आहेत. असं झाल्यास प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा आरसीबी पहिला संघ असेल.

गुजरात टायटन्सला आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना खेळायचा आहे. संघाने 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. जर गुजरातने आजचा सामना जिंकला तर ते आरसीबी सोबत प्लेऑफमध्ये क्वालिफाय करतील.

पंजाब किंग्स आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्यांचा 12 वा सामना खेळण्यासाठी उतरू शकते. पंजाबने 11 सामन्यात 15 पॉईंट्स मिळवले असून ते सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. जर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना जिंकणं त्यांना शक्य झालं तर त्यांच्या खात्यात 17 पॉईंट्स होतील आणि त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळू शकेल. त्यानंतर पंजाब टॉप 2 मध्ये आपलं स्थान बनवण्याचा प्रयत्न करेल.

दिल्ली कॅपिटल्सने 11 सामने खेळून 13 पॉईंट्स मिळवले असून त्यांना प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी उर्वरित 3 पैकी कमीत कमी 2 सामने जिंकावे लागतील. मात्र त्यांचे पुढील सामने हे पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स विरुद्ध आहेत. यापैकी मुंबई विरुद्धचा सामना हा जास्त महत्वाचा असणार आहे.

मुंबई इंडियन्सकडे सध्या 14 पॉईंट्स असून त्यांचे 2 सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी त्यांना 18 पॉईंट्सपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर मुंबई इंडियन्स एकही सामना हरते तर ते 16 पॉईंट्सवर येऊन थांबतील. त्यामुळे त्यांना प्लेऑफ क्वालिफाय करण्यासाठी दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल.

लखनऊ सुपर जाएंट्स हा संघ अजूनही अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर पडलेला नाही. लखनऊचे तीन सामने शिल्लक असून त्यांना प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. सध्या त्यांच्या खात्यात 11 सामन्यांचे 10 पॉईंट्स आहेत. उर्वरित तीन सामने जिंकण्या सोबतच त्यांना नेट रनरेट चांगला ठेवण्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल.