सामना गमावूनही शुभमनने आपली चूक मान्य केली नाही, मॅच संपल्यानंतर नेमकं काय म्हणाला?

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 64 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सला लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो प्रभावी ठरला नाही. अशा परिस्थितीत, सामन्यानंतर कर्णधार गिल आपल्या निर्णयाचे समर्थन करताना दिसला.

लखनौविरुद्धच्या पराभवानंतर शुभमन गिल निश्चितच निराश झाला होता, परंतु प्रथम गोलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल तो म्हणाला की, “हा निर्णय चुकीचा नव्हता. आम्ही गोलंदाजीत 15-20 अतिरिक्त धावा दिल्या. आम्हाला ते 215-220 धावा करतील अशी अपेक्षा होती. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा नव्हता आणि आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात शाहरुख आणि रदरफोर्डने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती आमच्यासाठी सकारात्मक होती. पुढच्या सामन्यात आम्ही पुन्हा वेग मिळवण्याचा प्रयत्न करू.”

लखनौने 235 धावा केल्या होत्या
गुजरातविरुद्धच्या या सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करत शानदार सुरुवात केली. लखनौसाठी मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. 24 चेंडूत 36 धावा काढून मार्कराम बाद झाला असला तरी, मार्शने एकट्याने संघाचा किल्ला सांभाळला आणि 56 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले.

लखनौकडून 117 धावा करून मिचेल मार्श बाद झाला. त्याच्या खेळीत त्याने 64 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 10 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. हे मिचेल मार्शचे आयपीएलमधील पहिले शतक होते. मार्श व्यतिरिक्त, लखनौसाठी निकोलस पूरनने 27 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी केली, तर कर्णधार ऋषभ पंतने 16 धावा केल्या. अशाप्रकारे संघाने निर्धारित 20 षटकांत 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला फक्त 202 धावा करता आल्या. गुजरातला गुणतालिकेत टॉप 2 मध्ये स्थान पक्क करायचे असल्यात दुसरा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.