नुकत्याच झालेल्या पुण्याच्या ‘वैष्णवी हगवणे’नंतर नाशिकमध्ये ‘भक्ती गुजराथी’चा बळी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर (Gangapur) येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित(married)महिलेचे नाव आहे. तिची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी शंका व्यक्त करत गंगापूर पोलीस ठाणे गाठले. आपली कैफियत मांडत भक्तीला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराथी (40) यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराथी (37) यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी भक्तीचा फरार पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अंत्ययात्रेत झळकले फलक
यानंतर पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तीवर तिच्या माहेरी येवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अटक करा, अटक करा, दोषींना अटक करा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेत झळकवत न्यायासाठी टाहो फोडला.

भक्तीला न्याय मिळेल का?
दरम्यान, पुण्याचे वैष्णवी हगवणे या हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्याच पद्धतीने येवल्यातील ‘भक्ती गुजराथी’ या विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी आरोप गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून भक्तीला न्याय देण्याची भावना आता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. भक्तीला न्याय मिळेल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.