मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, वरळी मेट्रो स्थानकावर गळती सुरू

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं दिसून आलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतल्यावर बुधवारी दुपारनंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली.

मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं विलंबानं धावत आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईचा पश्चिम उपनगरात दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुंबई सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झाली आहे. वरळी मेट्रो स्थानकातील तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरू झाली असून ती रोखण्यासाठी खाली बादली ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. बादली भरल्या नंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकले जात असून छत गळतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर वरळी स्थानकावरही तातडीने लक्ष द्यावे अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.