राज्य सरकारची गेमचेंजर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना . विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळेच महायुती सरकारला पुन्हा एकदा मोठ्या संख्याबळाने सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे, निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली ही योजना आता निधीवरुन सातत्याने चर्चेत असते. या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत असेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी व न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचे सांगितले जात होता. आता, या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखाचा निधी वर्ग करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा अदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी माझ्याकडे यावे असेही ते म्हणाले.
लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, या विभागांचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलं आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी(Chief Minister) लाडकी बहिण योजनेचा निधी वळवल्याच्या आरोपावर प्रत्त्युत्तर व स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेला आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला.
शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार
दरम्यान, राज्यामधील शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. शेतकरी अत्यंत महत्त्वाचे संशोधन करतात, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट प्रयोग केले त्या शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार द्यावेत, असा विचारही विद्यापीठांपुढे मांडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे
अशोक उईकेंनी देखील वृत्त फेटाळले
दरम्यान, याच मुद्यावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नसल्याचे मत अशोक उईके यांनी व्यक्त केले आहे. लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना असून तिची अंमलबजावणी करणे सरकार म्हणून आमची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळं आमचा निधी कमी केला हा अपप्रचार थांबवला पाहिजे असे अशोक उईके यांनी म्हटले आहे.
वळवलेला निधी आम्हाला परत मिळाला – रामदास आठवले
मागच्यावेळी सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवला होता, आता आदिवासी विकास विभागाचा निधी वळवत आहेत. पण ते पैसे आम्हाला परत मिळावे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. तसेच, परत मिळालेले पैसे एससी-एसटी प्रवर्गाच्या विकासासाठी वापरले जावेत, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. सध्या लाडक्या बहिणींना या निधीची गरज आहे, त्यामुळे या दोन्ही विभागाकडून तो निधी वळवला गेला असेल मात्र तो निधी परत या दोन विभागांना मिळावा अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही आठवलेंनी म्हटले.
