बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघातील तीन टर्म सलग काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करणारे निष्ठावंत ज्येष्ठ माजी आमदार दिलीप सानंदा हे अखेर 12 जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी काँग्रेसचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी खामगाव सुरू करण्यात आली आहे. जवळपास 25 हजार छत्र्या, 25 हजार घडाळे व 25 हजार फोटो अशी तयारी खामगाव मतदार संघात सुरू आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार असल्याचीही चर्चा आहे.
काही दिवसांपासून दिलीप सानंदा हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. तरी देखील जप तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हुं असे म्हणत ते वेट अँड वॉचची भूमिका घेत होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे जेव्हापासून बुलढाण्यातीलच हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाला लागले आहेत, त्यावेळीपासून काँग्रेसला मोठी गळती जिल्हात सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर देखील एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
1999, 2004 आणि 2009 असे सलग तीन वेळा सत्तेत काँग्रेस असताना माजी आमदार दिलीप सानंदा यांचा राज्यात मतदारसंघात दबदबा होता. काँग्रेस पक्षासाठी सतत झटणारे म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे. यासोबत त्यांचं इतर पक्षांमध्ये देखील चांगले स्नेहसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता तेव्हा देखील माजी आमदार दिलीप सानंदा यांची गुप्त भेट झाली होती. अमरावतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता तेथेही सार्वजनिक व्यासपीठावर ते एकाच ठिकाणी दिसून आले.
सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेसचे निष्ठावंत बाजार समिती सदस्य यांनी देखील मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यावेळेस देखील तिथे माजी आमदार दिलीप सानंदा उपस्थित होते आणि तेव्हापासूनच दिलीप सानंदा हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे दिसून आले, मुख्य म्हणजे ज्या खामगाव मतदार संघात दिलीप सानंदा राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत, तिथे भाजपची तगडी ताकद आहे.
काँग्रेस विरुद्ध भाजप जसे समीकरण आजपर्यंत या मतदारसंघांनी पाहिले आहे. तसेच सानंदाविरुद्ध फुंडकर परिवार हा देखील मोठा संघर्ष वेळोवेळी या मतदारसंघात दिसून आला आहे. त्यामुळे आता सानंदा सहभागी झाल्यानंतर खामगावतूनच सध्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले आकाश फुंडकर हे कसे एकामेकांशी जुळून घेता हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. आजा जिल्हातील राजकारण पूर्णपणे बदलताना दिसत आहे.