ठाकरे बंधू एकत्र येणार, शिवसेना उबाठा आणि मनसेची युती होणार, अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरु आहेत. एप्रिलच्या अखेरीस मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एका मुलाखतीत याबद्दलचं विधान केलं. आमच्यातील मतभेद महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीत, असं विधान राज यांनी केलं. त्याला उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तेव्हापासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आता खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येतील, असा ठाम विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. ‘उद्धव ठाकरे काल काय म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल. राज्याच्या मनात काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरे जेव्हा ते बोलतात, तेव्हा ते संकेत देतात. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले काही लोक आहेत, त्यांना भीती वाटते की हे दोन बंधू एकत्र आले तर आपलं काय होईल?,’ असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
ठाकरे बंधू सोबत येण्याचे परिणाम खूप मोठे असतील, असंही राऊत यांनी सुचवलं. त्यावेळी त्यांचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. ‘ठाकरे एकत्र येणं आणि नवी ऊर्जा निर्माण होणं ही त्यांची ताकदच आहे. त्यांची भीती अनेकांना वाटणार. आमच्यातून फुटून गट निर्माण झाले आहेत, ते सगळे गट जमीनदोस्त होतील. त्यांचं राजकारणातील महत्त्वच संपून जाईल,’ असं भाकित राऊतांनी वर्तवलं.
गेल्या महिन्याभरापासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राज यांचा एकही शिलेदार विधानसभा निवडणुकीत जिंकलेला नाही. तर उद्धव ठाकरेंचे केवळ २० उमेदवार विजयी झाले आहेत. राज आणि उद्धव यांच्यासाठी सध्या अस्तित्त्वाची लढाई सुरु आहे. ठाकरे ब्रँड संकटात सापडल्यानं दोन भावांना एकमेकांची कधी नव्हे इतकी गरज भासू लागली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनं युतीबद्दल सकारात्मक भूमिका मांडली जात आहे.
