नोकरी करणाऱ्या दोन मित्रांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलं ‘खास’ प्लॅटफॉर्म

कृषी क्षेत्रातील चांगली जाण असणाऱ्या दोन मित्रांनी मिळून एक मोठे यश मिळवले आहे. शशांक सिंह आणि भुवनेश गुप्ता असे या दोघांचे नाव आहे. या दोघांनी नोव्हेंबर २०२० मध्ये ‘पोष्ण’ नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म (Platform) सुरू केले, ज्याचा उद्देश कृषी उत्पादनांच्या व्यापाराला सोपे करणे हा होता. तीन वर्षांत या प्लॅटफॉर्मने कोट्यवधींची उलाढाल केली आहे. शशांक आणि भुवनेश यांनी त्यांच्या चांगल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून हे काम सुरू केले. पोष्ण शेतकऱ्यांसाठी विक्री प्रक्रिया सुलभ करते. हा प्लॅटफॉर्म कोणत्याही गोदामाशिवाय काम करतो, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही चांगले मूल्य मिळते.शशांक सिंह आणि भुवनेश गुप्ता यांच्या यशोगाथेबद्दल जाणून घेऊया.

शशांक सिंह आणि भुवनेश गुप्ता हे कृषी पार्श्वभूमीतून आले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या होत्या. शशांक उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील आहे, तर भुवनेश पंजाबमधील जालंधरचा आहे. शेतकऱ्यांना मध्यस्थांमुळे त्यांची शेतीमालाची विक्री करताना अडचणी येतात, हे दोघांनीही ओळखले. यामुळे वेळ लागतो, खर्च वाढतो आणि पेमेंटमध्येही धोका असतो. पोष्ण हे याच समस्येचा उपाय आहे. हा बी2बी प्लॅटफॉर्म प्रोसेसर (जे शेतीमालाला बाजारात विकण्यायोग्य बनवतात, जसे गव्हाचे पीठ) आणि घाऊक विक्रेत्यांना थेट शेतकऱ्यांशी जोडतो. या थेट संपर्कामुळे मध्यस्थांची गरज संपते, खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे चांगले मूल्य मिळते. त्याच वेळी, खरेदीदारांनाही चांगल्या गुणवत्तेची उत्पादने परवडणाऱ्या दरात मिळतात.

पोष्णचे बिझनेस मॉडेल ‘विना गोदामा’ धोरणामुळे खास आहे. शशांक आणि भुवनेश मालाचा साठा करुन ठेवत नाहीत, तर ऑर्डरनुसार माल खरेदी करतात आणि नंतर त्याची डिलिव्हरी करतात. ही रणनीती केवळ ऑपरेशनल खर्च कमी करत नाही, तर शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही चांगले मूल्य मिळण्याची खात्री करते. पोष्ण मुख्यतः किराणा सामान (जसे की तांदूळ, पीठ, खाद्य तेल) आणि इतर उत्पादने (जसे दूध) यांच्या घाऊक व्यापारावर लक्ष केंद्रित करते. खरेदीदार आणि विक्रेते स्मार्टफोन ॲपद्वारे ऑर्डर देतात आणि प्राप्त करतात. पोष्ण प्लॅटफॉर्म लॉजिस्टिक्सपासून ते पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया हाताळतो. हे ॲपवर ट्रॅक केले जाऊ शकते.हे लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांच्या भांडवलाची कमतरता देखील दूर करते, कारण नियमित व्यापार आणि त्वरित पेमेंट त्यांची खेळती भांडवल स्थिर ठेवते.

शशांक सिंह उत्तर प्रदेशातील उन्नावच्या एका कृषी कुटुंबातील आहेत, जिथे त्यांनी लहानपणापासूनच शेतीत येणाऱ्या अडचणी पाहिल्या. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS), पिलानीमधून त्यांनी इंजिनीअरिंग आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए केले. त्यानंतर त्यांनी विप्रो, ब्लॅकबक आणि उबर यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केले. पंजाबमधील जालंधरचे भुवनेश गुप्ता यांनी बँकिंग आणि ई-कॉमर्ससारख्या विविध क्षेत्रांमध्ये ओयो रूम्स आणि भारत पे यांसारख्या कंपन्यांसोबत काम केले. शशांक आणि भुवनेश 2019 मध्ये भेटले आणि कृषी क्षेत्रातील त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांनी ‘पोष्ण’ एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.नोव्हेंबर 2020 मध्ये 1 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या प्रवासात, त्यांनी स्वतःच कामकाज सांभाळले आणि हळूहळू टीम तयार केली.

पोष्णने सुरुवातीच्या सहा महिन्यांत 80 लाख रुपयांचा व्यवसाय केला, त्यानंतर कमालीची गती मिळाली आणि व्यवसाय 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यांनी 510 कोटी रुपयांचे GMV मिळवले. दिल्लीमध्ये 1000 चौरस फुटांच्या ऑफिसमध्ये असलेल्या पोष्णमध्ये आता 70 कर्मचारी आहेत. हे दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सक्रिय आहे.शशांक आणि भुवनेश यांचे उद्दिष्ट पोष्णला संपूर्ण भारतात पसरवणे आणि पुढील पाच वर्षांत झपाट्याने विकास करणे आहे, जेणेकरून ते भारताच्या कृषी-व्यापार क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी भूमिका बजावू शकतील.