मान्सूनने दक्षिण व मध्य भाग व्यापला असून उत्तरेतील राज्यांमध्ये तुफान हजेरी लावली आहे. सध्या कमी दाबाच्या सक्रीय पट्ट्यामुळे उत्तरेत राजस्थानसह हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची नोंद होतेय. दक्षिण भारतातही पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 30-40 किमी असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.गेल्या 24 तासांत विविध कोकण आणि घाट भाग हलक्या ते मध्यम पावसाची नोंद आहे.
अरबी समुद्रापासून (Arabian Sea) दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, ते झारखंडपर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात पाऊस ओसरला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी “मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस” पडण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (12 जुलै) छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव तसेच अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
13 जूलै- रत्नागिरी, सातरा व नाशिक घाटपरिसर, धुळे, नंदूरबार या जिल्हयांना यलो अलर्ट, पुण्यासह नगर, पालघर, संभाजीनगर, जालना व जळगाव जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्तता आहे.
14 जुलै- तळकोकणासह किनारपटटी भागात पावसाचे यलो अलर्ट- यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयांसह पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यालाही यलो अलर्ट आहे.
