राज्याच्या राजकारणात (Politics) आणखी एक युती झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युती जाहीर केली आहे. पत्रकार परिषद घेत दोन्ही नेत्यांनी युतीची घोषणा केली. “आपल्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं चांगलं जमेल. मुख्यमंत्री असतानाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. आधी मी CM म्हणजे कॉमन मॅन होतो. पण आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आनंदराज आंबेडकरदेखील ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि जगातील सर्वोत्तम ठरली त्यांचे वारस आहेत. आज त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणूस उच्चपदावर पोहोचला. एकनाथ शिंदे बाबासाहेबांच्या संविधानामुळे मुख्यमंत्री झाले. नरेंद्र मोदीही सर्वसामान्य कुटुंबातून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. न्यायापालिका, कार्यपालिका या सर्वांपेक्षा संविधान सर्वोच्च आहे. यातून सर्वसामान्य माणूस, दलित, शोषित यांना न्याया मिळाला पाहिजे, तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आज त्यांच्यामुळे देशाचा कारभार सुरु आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितंलं.
