सर्व्हर डाऊनमुळे रेशनकार्डाची कामे ठप्प

इचलकरंजी,विविध कामासाठी महत्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाणारे रेशनकार्डाची कामे गेल्या महिन्याभरापासून ठप्प आहे. रेशनकार्डाच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पुरवठा कार्यालयात येवून पुन्हा माघारी परतावे लागत आहे. तेव्हा याबाबत खासदार, आमदारांनी लक्ष घालून रेशनकार्डाची कामे पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 विविध शासकीय तसेच निमशासकीय कामामध्ये रेशनकार्ड महत्वाचे मानले जाते. नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्डमध्ये नव्याने नाव लावणे  अथवा कमी करणे आदि कामे येथील पुरवठा कार्यालयातून केली जातात. त्यासाठी दररोज शेकडो नागरिक पुरवठा कार्यालयात येत असतात. 
 मात्र, गेल्या महिन्याभरापासून शासनाचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना हेलपाटे मारून परत जावे लागत आहे. 

गेल्या महिन्याभरापासून नवीन रेशनकार्ड, विभक्त कार्ड, तसेच नाव कमी करणे व वाढवणे अशी कोणतीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा याबाबत खासदार, आमदार यांनी लक्ष घालून पुरवठा कार्यालयातील बंद असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन सुरू करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

इचलकरंजी शहरात ४ हजार ९३० इतके अंत्योदर रेशनकार्ड आहेत. तर प्राधान्य ३५ हजार ६४२ आणि केशरी ३६ हजार ३८८ इतकी रेशनकार्ड आहेत. त्यामुळे दैंनदिन कामासाठी तसेच अन्य कारणासाठी पुरवठा कार्यालयात यावे लागते परंतू तेथील सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना खाली परवावे लागत आहे. 
एकीकडे पुरवठा कार्यालयातील रेशनकार्डाची सर्व कामे ठप्प असताना दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेतील इंदिरा गांधी विधवा अपंग, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या काही महिन्यापासून पेन्शनची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधीनी लक्ष देवून नऊ महिन्यांचे अनुदान त्वरीत मिळवून द्यावे अशी मागणी होत आहे.