मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या हजारो समर्थकांसहीत मुंबईत दाखल झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले जावे अशी जरांगेंची मागणी आहे. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद मैदान येथे आपण आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं आहे. जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जरांगे संपूर्ण आंदोलन आझाद मैदानावर करण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच आता मुंबईत ऐन गणेशोत्सवादरम्यान काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र अगदी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या मूळ मागण्या काय आहेत? हेच अनेकांना ठाऊक नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधित आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे:
मराठा समाजाला इतर मागासवर्ग (OBC) मधून आरक्षण मिळावे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असून, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी:
मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडतात, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही (नातेवाईकांना) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. यासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे, असे जरांगेंचे म्हणणे आहे.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत:
मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही जरांगेंनी केली आहे. विशेषतः अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची जरांगेची मागणी आहे.
शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी:
मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मान्य झाली आहे. तसेच, वंशावळ जोडण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी, असेही जरांगेंनी सुचवले आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाई:
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जरांगेंची मागणी आहे. विशेषतः मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.
ओबीसी सर्वेक्षण:
दर 10 वर्षांनी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातींचे सर्वेक्षण करून त्यांना आरक्षणातून वगळावे, अशी मागणी त्यांनी केली होती, ज्याने खळबळ उडाली होती.
या मागण्यांसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषणे, मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. त्यांनी सरकारला अल्टिमेटम देऊन शांततापूर्ण मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
