‘या’ नदीवर होतंय धरण, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, सहा गावांचे स्थलांतर..

मुंबईलगतचा जिल्हे असलेले ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक धरणे आहेत. तानसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर ही सर्वात मोठी धरणे मुंबईकरांची तहान भागवतात. मात्र मुंबईचा विस्तार वाढत आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळं पाण्याची मागणीदेखील वाढणार आहे. त्यादृष्टीने सरकारने आत्तापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईलगतच्या जिल्ह्यात नवीन धरण बांधण्यात येणार आहे. दोन महिन्यात या धरणासाठी निविदा काढण्याचे आदेश, मंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.

मुंबईला सध्या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. दररोज 4000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र येत्या काही वर्षांत मुंबईकरांच्या पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळं मुंबई महापालिका गारगाई धरण प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या वनखात्याकडून काही परवानग्या बाकी आहेत. या परवनग्या मिळाल्यानंतर तातडीने प्रकल्पाच्या निविदा मार्गी लावा, असे आदेश शेलार यांनी दिले आहेत.

गारगाई धरण हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणामुळं वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या सहा गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. ओगदा आणि खोडदे गावांच्या स्थलांतरातून मिळालेल्या क्षेत्रावर प्रकल्पाची बांधणी होणार आहे. तसंच, उर्वरित जागेचा वापर वनीकरणासाठी केला जाणार आहे.

वैतरणाची उपनदी असलेली गारगाई नदी पश्चिम घाटातून खाली येत तानसा वन्यजीव अभयारण्य आणि पालघर जिल्ह्यातील घनदाट जंगलातून जाते. प्रस्तावित गारगाई धरण 69 मीटर उंचीचे व 972 मीटर लांबीचे आहे. धरणाचे पाणी दोन किमीवर असलेल्या मोडसागर धरणात बोगद्याद्वारे आणले जाणार आहे. गारगाई धरणामुळं मुंबईला दररोज 440 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीपुरवठा होईल. प्रकल्पामुळं 1100 हेक्ट जमीन बाधित होणार असून यामधील 700 हेक्टर जमीन तानसा अभयारण्याची आहे.