टीम इंडियाची घोषणा ! BCCI ने वेस्ट इंडिजविरुद्ध ‘या’ 15 शिलेदारांना दिली संधी

आशिया कप 2025 संपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका सुरू होणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती 25 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार झाल्यानंतर घरच्या मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच कसोटी मालिका आहे. घरच्या मैदानावर खेळली गेलेली शेवटची कसोटी मालिका ऑक्टोबर 2025 मध्ये होती, जेव्हा न्यूझीलंडने भारताला 2-0 असे पराभूत केले होते.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे देण्यात आली आहे. सरफराज खानला संघात स्थान मिळालेले नाही. देवदत्त पडिक्कलची भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र करुण नायर आणि आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंड मालिकेत करुण नायर अपयशी ठरला होता. त्यांनी चार कसोट्यांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले होते. यष्टीरक्षक ऋषभ पंत अजूनही पूर्णपणे फिट नसल्याने त्यांच्या जागी नारायण जगदीशनला संधी देण्यात आली आहे. तसेच अक्षर पटेलनेही कसोटी संघात पुनरागमन केले आहे.

भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 100 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 23 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने 30 विजय मिळवले आहेत. तब्बल 47 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने वेस्ट इंडिजवर सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध शेवटची कसोटी मालिका 2002 साली जिंकली होती. मागील पाच मालिकांपैकी तीन वेळा भारताने वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला आहे.