भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुल याने अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे अकरावे शतक आहे. राहुलने 190 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शिट्टी वाजवून सेलिब्रेशन केले. त्याने कर्णधार शुभमन गिलसोबत 98 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. गिलनेदेखील अर्धशतक (50) झळकावत साथ दिली. राहुलच्या संयमी आणि परिपक्व फलंदाजीमुळे भारताने या कसोटीत मजबूत पकड मिळवली आहे.
राहुलने डावाची सुरुवात सावधगिरी केली. त्याने 101 चेंडूत आपले पहिले 50 धावा पूर्ण केल्या. 2016 नंतर भारतात केलेले हे त्याचे पहिले शतक आहे. त्यावेळी त्याने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध 199 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 11 अर्धशतके झळकावली होती, मात्र ती शतकांत रूपांतरित करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचे हे फक्त दुसरे शतक आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये राहुल सातत्याने चमकला आहे. आठ कसोटी सामन्यांतील 11 डावांत त्याने 450 पेक्षा जास्त धावा केल्या असून त्याची सरासरी 51 पेक्षा जास्त आहे. 2016 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 158 धावांची खेळी केली होती. या शतकामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची शतकांची संख्या दोन झाली आहे. तसेच, त्याने या संघाविरुद्ध दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.
आत्तापर्यंत राहुलने 64 कसोटी सामने खेळले असून 112 डावांत त्याच्या नावावर 3,800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 36 पेक्षा जास्त आहे. त्याने 11 शतके आणि 19 अर्धशतके केली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 आहे. भारताबाहेर खेळताना त्याने 43 कसोट्यांत 9 शतकांसह 2,640 धावा केल्या आहेत, तर भारतात 21 कसोट्यांत 2 शतकांसह 1,200 हून अधिक धावा त्याच्या नावावर आहेत.
नाणेफेक जिंकून फलंदाजीस उतरताना वेस्ट इंडिज संघ पूर्णपणे ढेपाळला. जॉन कॅम्पबेल (8) आणि टेग्नारिन चंद्रपॉल (0) स्वस्तात बाद झाले. अखेर संपूर्ण संघ फक्त 44.1 षटकांत गडगडला. जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याशिवाय शाई होपने 26 आणि रोस्टन चेसने 24 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 4 तर जसप्रीत बुमराहने 3 बळी घेतले.
