रामदास कदमांनी सांगितले, बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात ठेवला; संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते ? असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता? दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला? तुमचं अंतर्गत काय चाललं होतं? असे सवाल देखील रामदास कदमांनी उपस्थित केले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय.

संजय राऊत म्हणाले की, मी तिथे होतो, हे तिथे नव्हते. आम्ही त्यावेळी मातोश्रीवर होतो. बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात आम्ही तिथे शेवटपर्यंत होतो. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते आता बोलत असतील तर काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला आणि आम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला, आम्हाला मोठं केलं, त्यांच्याशी ही बेईमानी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना म्हटले होते की, “माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असं त्यांनी म्हटले.

तर दसरा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी मी मेळाव्यात जे बोललो ती माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असे त्यांनी म्हटले. याचं कारण काय होतं? याबाबत विचारलं असता हे तुम्ही उद्धव ठाकरेंनाच विचारा. याबाबत मी कसं काय सांगणार? मातोश्रीवर ही चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काही समजलं नाही. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले, असे रामदास कदम यांनी सांगितले.