इचलकरंजी, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ करत मारहाण प्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित अजय साळुंखे (वय ३५), वैभव आनंदा साळुंखे (वय २० रा. गणेशनगर), राजू दत्ता साळुंखे (वय४५), तुषार राजू साळुंखे (वय २५ दोघे रा. पद्मा लॉण्ड्रीशेजारी), उदय आनंदा निकम ( वय ३२ रा. आयकॉन पार्क आमराई रोड), सुशांत सदाशिव घोरपडे (वय ३४ रा. नारायणमळा ), प्रसाद बाबासो जाधव (वय ३८ रा. गांधी कॅम्प) आणि ओंकार प्रमोद लाटवडे (वय २०, रा. मंगळवारपेठ) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गावभाग पोलिस ठाण्यातील ध्वनी प्रदुषण विरोधी पथकाकडून पेट्रोलिंग सुरु असताना झेंडा चौक परिसरात गर्दी जमल्याचे निदर्शनास आले. तेथे जावून माहिती घेतली असता उपरोक्त आठजण एकमेकांशी वाद घालत मोठमोठ्याने ओरडत व शिवीगाळ करत मारहाण करत होते. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच ऐकत नसल्याने नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड व मारहाण प्रकरणी उपरोक्त आठजणांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
