मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत.
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray Mumbai Local) मोर्चात सहभागी होण्यासाठी चर्चगेटला लोकलने प्रवास करत पोहोचले आहेत. सध्या ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबले आहेत.
विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय ?
मतदारयाद्या अद्ययावत करा.
मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.
मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.
सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.
कसा असेल मोर्चाचा मार्ग ?
दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.
ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे… मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.
या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
