सांगली जिल्ह्यात रब्बीचा पेरा पोहोचला २७ टक्क्यांवर

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला ब्रेक लागला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रब्बी हंगामातील पेरणी ५३,२१६ हेक्टर म्हणजे २७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

येत्या पंधरा दिवसांत पेरणीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ५८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाळवा, मिरज, शिराळा, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांत दमदार पाऊस झाला. वाळवा तालुक्यातील बहे मंडलात ८०.८ तर आष्टा मंडलात १११. मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या पाच तालुक्यांत पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला अडथळे निर्माण झाले होते.

दरम्यान, दुष्काळी भागातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव तालुक्यात पावसाची उघडीप होती. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणीला अडथळे आले नाहीत. दुष्काळी तालुक्यात प्रामुख्याने रब्बी ज्वारीची पेरणी लवकर सुरू झाली आहे. जत तालुक्यात सर्वांत जास्त ज्वारीचा पेरा झाला आहे. ज्वारी बरोबर मका, हरभरा आणि गहू या पिकांचीही पेरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९४ हजार ३९३ हेक्टर आहे. आजअखेर ५३,२१६ हेक्टर म्हणजे २७ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे. वाळवा, मिरज, शिराळा, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांत कमीअधिक क्षेत्रावर ज्वारी, मका, गहू, आणि हरभऱ्याचा पेरा झाला आहे.

ऊस लागवडीस गती

आडसाली हंगामातील ऊस लागवडीचा कालावधी संपला आहे. या कालावधीत कृषी विभागाकडे २१ हजार २८० हेक्टर उसाची नोंद झाली आहे, असे अहवालत नमूद केले आहे. अजूनही या हंगामातील उसाची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बहुतांश भागातील शेतकरी पूर्व हंगामातील अनेक भागांत ऊस लागवडीचे नियोजन करू लागला आहे. या हंगामातील ऊस लागवडीला गती आली आहे.

तालुकानिहाय पेरणी दृष्टिक्षेप

तालुका क्षेत्र (हेक्टर)

मिरज १३,९६५

जत २०,१८२

खानापूर २२५

वाळवा ८२३

तासगाव ३७३

शिराळा १५५

आटपाडी ११,४५२

कवठेमहांकाळ ५,५९९

पलूस ३०१

कडेगाव १८४

एकूण ५३,२६१